<div id="MiddleColumn_internal" style="text-align: justify; "> <p style="text-align: justify; ">गर्भनिरोधक म्हणजे गर्भधारणा टाळण्याचा मुद्दाम केलेला प्रयत्न होय. अंड्याचं शुक्राणुशी मिलन होतं आणि असं फलित अंडं हे गर्भाशयाच्या आतल्या स्तराला चिटकतं आणि वाढायला लागतं त्यावेळी गर्भधारणा होते. ही प्रक्रिया लक्षात घेऊन, गर्भधारणा टाळण्याचे मूलभूत पाच मार्ग आहेतः</p> <ul style="text-align: justify; "> <li>सर्वात सामान्य पध्दत म्हणजे समागम न करणे, म्हणजे शिश्न आणि योनी यांचा संबंध न येऊ देणे. याची सुधारित आवृत्ती म्हणजे स्त्री जेव्हा सर्वात गर्भधारणाक्षम काळात असते तेव्हा असा संबंध न होऊ देणे (-हीदम पध्दत, गर्भधारणा जागरुकता पध्दत)</li> <li>आणखी एक साधी पध्दत म्हणजे, अंड्याचा शुक्राणूशी संयोग न होऊ देणं. यामधे विविध अडथळा पध्दती वापरल्या जातात (पुरुष आणि स्त्रियांचे कंडोम, पडदा आणि गर्भाशयाची टोपी) आणि कायमस्वरुपी पध्दत – पुरुष नसबंदी आणि स्त्री नसबंदी.</li> <li>तिसरा उपाय म्हणजे स्त्रीला अंडी निर्माण करण्यापासून तर पुरुषाला शुक्राणू तयार करण्यापासून प्रतिबंध करणे. यामधे तोंडावाटे घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स आणि त्वचेखाली उपकरण बसवणे यांचा समावेश आहे. पुरुष आणि स्त्रियांसाठी तयार करण्यात येत असलेली गर्भधारणा-विरोधी लसदेखील या प्रकारात मोडते.</li> <li>आणखी एक उपाय म्हणजे, फलित अंडं हे गर्भाशयाच्या भिंतीला चिटकणार नाही अशी व्यवस्था करणं. यामधे गर्भाशयात उपकरण बसवणे (आययूडी) आणि स्टेरॉईड-रहित गोळ्या.</li> <li>पाचवा मार्ग म्हणजे, गर्भधारणा झाल्यानंतर तो गर्भ काढून घेणे. यात मुद्दाम गर्भपात करवणे आणि गर्भपाताच्या गोळ्या घेणे यांचा समावेश आहे.</li> </ul> <p style="text-align: justify; ">त्यामुळे, गर्भधारणा टाळण्यासाठी विविध निरोधंकं विविध प्रकारे कार्य करतात आणि प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आणि आपल्या आरोग्याला धोका होणार नाही अशा पध्दतीने एक पध्दत निवडावी. हा निर्णय काही एखाद्याच्या संपूर्ण जीवनासाठी घ्यावयाचा निर्णय नव्हे.</p> <h3 style="text-align: justify; ">योग्य गर्भनिरोधक निवडताना लक्षात ठेवायचे घटक<strong> </strong></h3> <ul style="text-align: justify; "> <li>प्रभावीपणा, म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता किती आहे. ?</li> <li>ते सुरक्षित आहे का किंवा त्याचे गंभीर दुष्प्रभाव आहेत का ?</li> <li>त्याचे दीर्घकालीन विपरीत परिणाम आहेत का.. ?</li> <li>त्यामुळे स्तनपानावर परिणाम होईल का ? गर्भनिरोधकाचा प्रभाव स्तनातील दूधावर पडेल का ?</li> <li>भविष्यात त्या महिलेला होणा-या मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल का. ?</li> <li>त्या गर्भनिरोधकाचे काही प्रतिसूचक आहेत का, जसे, अनियमित रक्तस्त्राव होणा-या महिला किंवा अंडनलिकेत संक्रमण असलेल्यांनी ती वापरु नयेत.</li> <li>त्या गर्भनिरोधकाचं नियंत्रण त्याचा वापर करणा-याच्या हातात आहे का की ते आरोग्य सेवकाच्या हातात आहे?</li> </ul> <h3 style="text-align: justify; ">नैसर्गिक पध्दत (गर्भधारणाक्षम दिवसांमधे <span style="text-align: justify; ">समागम न करणे)</span></h3> <p style="text-align: justify; ">गर्भधारणा टाळण्याचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे अजिबात समागम न करणे. त्यानंतर चांगला मार्ग म्हणजे लिंगांचा परस्परांना स्पर्श न होऊ देणे, त्यांच्याविना देखील लैंगिक सुख आनंद देऊ शकतं. अनादि काळापासून स्त्रियांना माहिती आहे की महिन्याच्या केवळ काही दिवसांतच गर्भधारणा होते. त्यामुळं, त्या दिवसांत समागम टाळला तर त्या गर्भधारणा टाळू शकतात. संततिनियमनाची कोणतीही कृत्रिम पध्दत न वापरता गर्भधारणा टाळण्यासाठी आता पुढील पध्दती उपलब्ध आहेत.</p> <p style="text-align: justify; "><strong>कॅलेंडर पध्दतः </strong>या पध्दतीनुसार मासिक पाळी सुरु झाल्यानंतर 10 दिवसांनी स्त्री गर्भधारणाक्षम होते त्यामुळे या दहा दिवसात समागम टाळावा. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान, पूर्वी आणि नंतरचा आठवडा हा सुरक्षित काळ समजला जातो. ही पध्दत विश्वासार्ह नाही कारण त्यामधे मासिक पाळीतील बदल विचारात घेतले जात नाहीत. कॅलेंडर पध्दतीत गृहीत धरलं जातं की सर्व स्त्रियांची पाळी 28 दिवसांची असते, आणि महिन्याच्या मध्यात अंडं तयार होतं. तथापि, प्रत्येक महिलेच्या पाळीची लांबी वेगवेगळी असते आणि अंडं येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. कोणतीही पध्दत न वापरण्यापेक्षा ही पध्दत थोडीशी बरी आहे.</p> <p style="text-align: justify; "><strong>गर्भाशयातील श्लेष्मा पध्दतः </strong>बहुतांश स्त्रियांना महिन्याच्या बहुतांश काळात योनीतून द्राव स्त्रवत असतो. ही चांगल्या आरोग्याची निशाणी आहे. हा श्लेष्मा त्याचे प्रमाण, सातत्य आणि रंग यांच्यानुसार बदलतो. काहीवेळा तो चिकट आणि पांढुरका असतो आणि इतर वेळी तो बुळबुळीत आणि पारदर्शक असतो. या श्लेष्माचे स्वरुप हे मासिक पाळीच्या अवस्थेनुसार बदलते. मासिक पाळीनंतर लगेच हा श्लेष्मा सामान्यतः कमी प्रमाणात, तुलनेनं कोरडा, घट्ट आणि पांढुरका असतो. अंडाशयात अंड जसं पक्व होऊ लागतं, शरीरात फिरणारा इस्ट्रोजेन हा हार्मोन या श्लेष्माला पारदर्शक, लांबट आणि बुळबुळीत करतो. अंड बाहेर येत असताना हा चिकटपणा आणि लांबटपणा अधिक असतो आणि त्यानंतर एक दिवसांनी ती स्त्री गर्भधारणेसाठी पूर्णतः तयार असल्याचे चिन्ह असतं. संबंधित स्त्रीला या श्लेष्माची या दिवशीच आपल्या बोटांनी तपासणी करुन आपल्या गर्भधारणाक्षम आणि अन्य दिवसांची निश्चिती करता येते.</p> <p style="text-align: justify; "><strong>शरीराचे मूलभूत तापमानः</strong> स्त्रीनं आपल्या शरीराचं तापमान रोज ठराविक वेळी तपासून पाहावं. प्रत्येक सकाळी लवकर आपल्या शरीराचं जे तापमान असतं त्याला मूलभूत तापमान असं म्हणतात. महिन्याच्या मध्यात, अंडं बाहेर येत असताना हे तापमान लक्षणीयरित्या वाढतं (अंदाजे 1-2 अंशांनी) आणि पुढची पाळी येईतोवर तसंच राहतं. ही पध्दत नेमकेपणानं वापरली तर तापमान वाढण्याच्या आधीच्या पूर्ण काळात लैंगिक संपर्क टाळणे गरजेचं ठरते, हा काळ अंदाजे 1-16 दिवसांचा असतो. एकदा का अंडं बाहेर आलं नंतरचे दोन दिवस हे गर्भधारणाक्षम असतात. त्यामुळं ज्या दिवशी समागम करणं सुरक्षित आहे ते दिवस अगदी थोडे आहेत. त्याशिवाय, रोजचं तापमान तपासण्याच्या त्रासामुळं ही पध्दत किचकट आहे.</p> <h3 style="text-align: justify; ">अडथळा पध्दती</h3> <h5 style="text-align: justify; ">अंडं आणि शुक्राणू यांचा संपर्क टाळण्याच्या पध्दती<strong> </strong></h5> <p style="text-align: justify; ">अडथळा पध्दतींमधे शुक्राणू आणि अंडं यांच्यात अक्षऱशः अडथळा निर्माण केला जातो. त्यामधे सध्या खालील पध्दती उपलब्ध आहेत.</p> <p style="text-align: justify; "><strong>पुरुष</strong><strong> </strong><strong>कंडोमः</strong> समागमादरम्यान शिश्नावर चढवायचं हे सिलींडरच्या आकाराचं रबराचं आवरण आहे. त्यामुळे शुक्राणू हे योनीत सोडले जात नाहीत. लिंगांचा स्पर्श होण्यापूर्वीच कंडोम हा ताठलेल्या शिश्नावर चढवला जातो कारण विर्य सोडलं जाण्यापूर्वी पुरुषाव्दारे द्रावाचे काही थेंब सोडले जातात ज्यामधे शुक्राणू असू शकतात किंवा रोगाचा प्रसार होऊ शकतो. विर्यस्खलन झाल्यानंतर, शिश्न हे योनीतून काळजीपूर्वक बाहेर काढावं जेणेकरुन वीर्य हे योनीच्या आत किंवा आसपास पडणार नाही. त्यानंतर तो कंडोम गुंडाळून नष्ट केला जातो. एक कंडोम एकापेक्षा अधिकवेळा वापरु नये. पुरुष कंडोम ही एक प्रभावी आणि सुरक्षित गर्भनिरोधनाची पध्दत आहे. त्याचे पुरुष किंवा स्त्रीवर कोणतेही दुष्प्रभाव नाहीत. एड्स आणि एसटीडीचा प्रसार टाळण्यासाठी देखील कंडोम अत्यंत प्रभावी आहेत. दोन मुलांमधे अंतर ठेवण्यासाठी कंडोम उपयुक्त आहेत कारण जेव्हा गर्भधारणा करायची आहे तेव्हा त्याचा वापर लगेच थांबवता येतो आणि ते सर्वाधिक वापरलं जाणारं गर्भनिरोधक आहे.</p> <p style="text-align: justify; ">काही लोक, विशेषतः पुरुष, यांना असं वाटतं की कंडोममुळं समागमातला आनंद कमी होतो. त्याशिवाय, काही लोकांना रबरची अलर्जी असते. कंडोम हा निकृष्ट दर्जाचा असेल किंवा बराच काळ साठवून ठेवला असेल, विशेषतः एखाद्या उष्ण जागी, तर, ते फाटू किंवा तुटू शकतात. समागमादरम्यान पुरेसा ओलसरपणा नसेल किंवा कंडोम चुकीच्या पध्दतीने वापरला असेल तरीसुध्दा तो फाटू शकतो, उदा., तो योग्य रीतीनं चढवलेला नसेल तर. कंडोम हे इतके प्रभावी असूनही पुरुष ते वापरत नाहीत याचं कारण संतति नियमनाची जबाबदारी घ्यायला ते इच्छुक नसतात हे आहे. तथापि, कंडोम वापरणं हा समागमाच्या खेळाचा एक भाग झाला तर, तो एक आनंददायी अनुभव बनू शकतो. कंडोम हे इतके सुरक्षित आहेत आणि एचआयव्ही तसंच एसटीडीच्या विरोधात त्यांचा अतिरीक्त फायदा असेल, तर पुरुषांना कंडोम वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता भरपूर प्रयत्न करणं फायद्याचंच ठरेल.</p> <p style="text-align: justify; "><strong>पडदाः</strong> एकोणिसाव्या शतकात शोध लागलेला हा पडदा, म्हणजे महिलांना गर्भधारणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठा शोध होता. हा पडदा गोलाकार, घुमटाच्या आकाराची रबरी चकती असते आणि तिला एक भक्कम कड असते ती योनीत सरकवून गर्भाशयाचं तोंड बंद केलं जातं आणि शुक्राणूंना मज्जाव केला जातो. प्रारंभी हा पडदा एक डॉक्टर / आरोग्य कार्यकर्ता बसवतो, कारण हा पडदा योनीच्या आकारानुसार 2 ते 4 इंच अशा विविध आकारांमधे येतो. योग्य आकाराचा पडदा एकदा बसवला की, ती महिलाच आवश्यक तेव्हा तो सरकवू आणि काढू शकते. समागम करण्यापूर्वी तो जागेवर बसवला पाहिजे आणि समागम झाल्यानंतर सहा तासापर्यंत तिथं ठेवला पाहिजे जेणेकरुन शुक्राणूनाशक, योनीत राहिलेल्या शुक्राणूंचा नाश करेल. त्यानंतर तो काढला जातो, साबण आणि पाण्याने धुतला जातो, पूर्णपणे वाळवला जातो आणि पुढील वापरपर्यंत बाजूला ठेवला जातो.</p> <p style="text-align: justify; ">या पडद्याच्या संभाव्य समस्यांमधे तो पुढे ढकलला जाणं आणि गर्भाशयात किंवा पिशवीत आखडलेपण येणं होऊ शकतं. काही महिलांमधे, यामुळे गर्भाशयाचा रोग किंवा वारंवार सिस्ट तयार होऊ शकतात. मूत्रमार्गाच्या संक्रमणाला प्रवण स्त्रियांनी किंवा ज्यांचे गर्भाशय खाली आले आहे त्यांनी हा पडदा वापरु नये. परंतु या पडद्याची एक विशेषता म्हणजे त्याचा वापर करणं हे महिलेच्या हातात असतं.हा पडदा भारतात सहजपणे उपलब्ध नाही. काही महिला संघटनांनी तो आयात करुन त्यांच्या वितरणाचा प्रयोग केला आहे. एका पडद्याची किंमत अंदाजे ४०० रुपये आहे. हे खर्चिक वाटत असलं तरी, हा पडदा पुन्हा वापरता येतो आणि चांगला ठेवला तर तीन वर्षांपर्यंत वापरता येतो.</p> <p style="text-align: justify; "><strong>गर्भाशयाची</strong><strong> </strong><strong>टोपीः</strong> ही एक थिंबलच्या आकाराची टोपी असून ती गर्भाशयाच्या मुखावर बसवली जाते. पडद्याप्रमाणेच ही टोपीसुध्दा शुक्राणूंना गर्भाशयात जाण्यास मज्जाव करते. ही टोपी अशी तयार करण्यात आली आहे की त्यामुळे गर्भाशयाच्या मुखावर एक हवाबंद सील तयार होतं. ओढून घेणं किंवा पृष्ठभागावरील ताणामुळं ते गर्भाशयाला अगदी चिटकून राहतं. दुर्दैवाने ही टोपी भारतात उपलब्ध नाही.</p> <p style="text-align: justify; "><strong>स्त्रियांचा</strong><strong> </strong><strong>कंडोमः</strong> स्त्रियांचा कंडोम हा मऊ, सैल बसणारं पॉलीयुरेथिनच आवरण असून ते एकाबाजूने बंद असतं. त्याच्यामुळं शुक्राणू हे योनीत प्रवेश करु शकत नाहीत. हा कंडोम समागमाच्या आधी योनीत सरकवला जातो. त्याच्या दोन्ही बाजूंना एक लवचिक पॉलीयुरेथिन रींग असते, एक बंद बाजूला असते तर दुसरी गर्भाशयाला झाकते आणि दुसरा खुलं टोक हे योनीच्या बाहेर राहतं. योनीच्या बाहेर असलेली रींग योनीचे मुख आणि शीश्नाचे टोक यांचा संपर्क होऊ देत नाही. हा कंडोम कुठल्याही प्रकारचा लैंगिक संबंध येण्यापूर्वी योनीत सरकवला पाहिजे. समागमानंतर स्त्री उठून उभी राहण्यापूर्वी तो काळजीपूर्वक बाहेर काढावा म्हणजे वीर्य योनीवर सांडणार नाही. हा कंडोम, पडदा आणि कंडोमच्या गुणांनी युक्त आहे. तो योनीत पडद्याप्रमाणेच सरकवला जातो, त्यात गर्भाशय थेट झाकलं जाण्याची काळजी घेण्याची गरज नाही. पुरुष कंडोमप्रमाणेच हा कंडोमदेखील एकदाच वापरता येतो.</p> <p style="text-align: justify; ">हा कंडोम योनीच्या आतली त्वचा तसंच गर्भाशयाला देखील झाकतो. त्यामुळं एचआयव्ही तसंच एसटीआयपासून संरक्षण मिळतं.समागमाच्या आधी तो सरकवला जात असल्यानं समागमात बाधा येण्याची शक्यता नाही. हा प्रमाणित आकारात येतो आणि तो बसवण्यासाठी डॉक्टरची आवश्यकता नसते. याचा एकच विचाराचा मुद्दा म्हणजे त्याची किंमत. आणखी म्हणजे समागम करताना त्याचा आवाज होतो आणि त्याचा वापर करुन तोंडाने समागम करणे आनंददायी नसते. हा कंडोम योनीमुखाच्या बाहेर असल्यानं अनेक स्त्रियांना समागमाचा पुरेपूर आनंद मिळत नाही आणि अस्वस्थता वाटते. हा भारतात सहजपणे मिळत नाही. या क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थाच बहुधा त्याचा प्रसार करतात.</p> <p style="text-align: justify; "><strong>शुक्राणूनाशकः</strong> शुक्राणूनाशक हे रसायन असून ते योनीच्या आत लावलं जातं, ते शुक्राणूंना निष्प्रभ किंवा मारुन टाकतं. हे रसायन फोम, गोळ्या (उदा. टुडे), जेली आणि क्रीम्स (उदा. डेल्फेन) या स्वरुपात येतं. समागमाच्या अगदी आधी ते विशेष उपकरणानं योनीच्या आत लावलं जातं. सामान्यतः ते एकट्या स्वरुपातच वापरलं जात नाही तर कंडोम किंवा पडद्याचा प्रभाव वाढवण्याकरता त्याचा वापर केला जातो. केवळ हे रसायन वापरल्यानं ते अयशस्वी ठरण्याचा अपेक्षित किंमान दर 6 टक्के तर नेहमीचा दर 26 टक्के आहे. ही शुक्राणूनाशकं सामान्यतः इतर कोणतेही दुष्प्रभाव करत नाहीत, परंतु काही महिलांना योनीत खाज किंवा अलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकते.</p> <h3 style="text-align: justify; ">परंपरेनं वापरल्या जाणा-या पध्दती</h3> <p style="text-align: justify; "><strong>स्तनपानः </strong> प्रसुतिनंतर त्या महिलेला पुन्हा पाळी येण्यास काही महिने जावे लागतात. ज्या महिला आपल्या बाळाला पूर्णतः स्तनपान करवतात त्यांच्यामधे हा कालावधी वाढतो. या काळात, पुन्हा गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी असते. तथापि, पहिल्या पाळीच्या आधी अंडं बाहेर येतं हे लक्षात ठेवावं. त्यामुळं, मासिक पाळी नाही आली तरी गर्भधारणा होण्याची शक्यता असते.</p> <p style="text-align: justify; "><strong>वेळेपूर्वीच माघारी घेणेः</strong> या पध्दतीत वीर्य योनीत सोडलं जाण्यापूर्वीच शिश्न योनीतून बाहेर काढलं जातं. ही काही प्रभावी पध्दत नाही कारण ती नेमकी वेळ चुकू शकते आणि योनी तसंच योनीमुखाशी संपर्क टाळणं अवघड असतं. त्यातच शिश्न ताठ होताच थोड्या प्रमाणात शुक्राणू सोडले जातात, गर्भधारणा होण्यास ते पुरेसे असतात.</p> <p style="text-align: justify; "><strong>गर्भाशयातील उपकरण (आययूडी):</strong> आययूडी हे एक लहान, लवचिक प्लास्टीक उपकरण असून ते गर्भाशयात बसवले जाते. बहुतांश उपकरणात तांबे किंवा सिंथेटीक प्रोजेस्टेरॉन असते. हे उपकरण महिलेच्या गर्भाशयात सरकवले जाते. ते एकदा बसवले की, त्याचे सामान्यतः दोन दोरे योनीच्या वरच्या भागापर्यंत येतात. योनीत एक बोट सरकवून त्या दो-यांना स्पर्श करुन हे उपकरण नीट जागेवर बसले आहे की नाही याची तपासणी करता येते.</p> <p style="text-align: justify; ">या उपकरणाचं कार्य अद्याप पूर्णपणे माहिती नाही. विशेषतः तांबे असलेल्या आययूडीमुळे गर्भाशयाचा दाह किंवा कमी-प्रतीचे संक्रमण होऊ शकते. या बदलांमुळे, शुक्राणू हे निकामी होतात किंवा मारले जातात किंवा त्यांच्या योनीतील हालचालीत बाधा येऊन गर्भधारणा अशक्य होऊन बसते. आययूडीमुळे अंड्याचा अंडनलीकेतील वेग वाढतो, त्यामुळे त्याचा शुक्राणूशी संयोग होणे शक्य होण्यासाठी ते फारच लवकर गर्भाशयात येते. फलन झाले तरीही, गर्भाशयातील परक्या वस्तुमुळं ते स्थिर होऊ शकत नाही.</p> <p style="text-align: justify; ">भारतात सध्या कॉपर-टी हे आययूडी सर्वाधिक वापरले जाते. ते दोन-तीन वर्षे वापरल्यानंतर बदलावे लागते. हे उपकरण एका डॉक्टरमार्फत गर्भाशयात पाळीच्या काळात किंवा त्यानंतर लगेच सरकवावे लागते म्हणजे ते बसवले जात असताना गर्भधारणा नाही याची खात्री केली जाते. हे अत्यंत प्रभावी गर्भनिरोधक आहे. तथापि त्याचे काही दुष्प्रभाव असून त्यापैकी काही गंभीर असतात.</p> <ul style="text-align: justify; "> <li>बसवल्यानंतर पहिले तीन ते पाच दिवसांनंतर तीव्र आखडणे आणि वेदना.</li> <li>तीव्र मासिक रक्तस्त्राव, किंवा दोन पाळींदरम्यान रक्तस्त्राव, त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता</li> <li>दुर्मिळ प्रकरणी, गर्भाशयाच्या भिंतीला छीद्र पडणे. गर्भाशयाचे अस्तर त्याभोवती गुंडाळले गेल्यास गुंतवळ होऊ शकते. असे गुंतलेले उपकरण काढतेवेळी अधिक वेदना देऊ शकते, काहीवेळा गर्भाशय फुगवणे आणि खरवडून काढणे आवश्यक ठरते.</li> <li>कटीभागाचा दाहरोग होतो, हे गर्भाशयाच्या अस्तर, त्याची भिंत, अंडनलीका, अंडाशय, गर्भाशयाचा पडदा, त्याचे स्नायू किंवा कटीभिंतीलगतचे पडदे यांचे हे संक्रमण असते. ते अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे होते. आययूडी वापरणा-या महिलांमधे ते न वापरणा-या महिलांपेक्षा दुप्पटीने हे संक्रमण होऊ शकते. </li> <li>हे उपकरण वापरणा-या महिलांमधे अपस्थानीय गर्भधारणा (कॉपर-टी वापरणा-यांमधे ३ टक्के) होण्याची अधिक शक्यता असते. बहुधा अंडनलीकेत होणारी ही गर्भधारणा एक गंभीर समस्या असून त्यामुळे रक्तस्त्राव होतो आणि संक्रमण, वंध्यत्व आणि काहीवेळा मृत्यु होऊ शकतो (जेव्हा तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध नसते).</li> <li>विचारपूर्वकच हे उपकरण निवडावे, ज्यांना आजवर मूल झालेलं नाही त्यांनी ते वापरु नये. योनीच्या संक्रमाणाला प्रवण असलेल्या अपस्थानीय गर्भधारणेचा इतिहास असलेल्या आणि वेदनादायक मासिकपाळीचा त्रास असणा-या किंवा अशक्त असणा-या महिलांसाठी हे उपकरण योग्य नाही.</li> </ul> <p style="text-align: justify; ">बहुतांश सरकारी आरोग्य सेवा केंद्रांमधे प्रसुती किंवा गर्भपातानंतर लगेचच आययूडी बसवून घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते. तथापि, ते अत्यंत धोकादायक असू शकतं.</p> <p style="text-align: justify; "><strong>स्टेरॉईड-विरहीत गोळीः </strong>भारतात सहेली किंवा चॉईस-7 या नांवाने ही गोळी अंडं गर्भाशयात जाण्याचा वेग वाढवते. फलन याआधीच झालेलं असेल तरीदेखील ही गोळी प्रभावी ठरते. या गोळ्या आदर्श गर्भनिरोधक म्हणून सरकारतर्फे त्यांचा प्रचार केला जातो. तथापि या गोळीमुळं स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉनचे कार्य बदलते. सेंटकोरोमॅनमुळे काही महिलांना अंडाशयात गाठी झाल्याचे ज्ञात आहे.</p> <p style="text-align: justify; "><strong>गर्भपातः </strong> गर्भपात म्हणचे प्रसुतीचा कालावधी पूर्ण होण्याआधी गर्भाशयातून गर्भ बाहेर काढून तो संपवणे. उत्स्फूर्त गर्भपात किंवा गर्भ पडणे यांच्याव्दारे निसर्गतःच गर्भधारणा संपवली जाते. मुद्दाम केलेला गर्भपात हासुध्दा वैद्यकी गर्भधारणा समाप्ती (एमटीपी) समजला जातो. गर्भनिरोधक वापरले तरीही, गर्भधारणा होऊ शकते. किंवा बलात्कार, जबरी संभोग किंवा बळजोरीनं समागम झाल्याने देखील गर्भधारणा होऊ शकते. फार पूर्वीपासून गर्भपात हा संतति नियमनाचा एक मार्ग म्हणून वापरला जातो. बाह्य मालीश, जोरदार शारीरिक कामे करणे, गर्भाशय तीक्ष्ण वस्तुने कोरणे, गर्भ पाडणारी वनौषधी आणि काढे घेणे हे उपाय स्त्रिया नको असलेला गर्भ काढण्यासाठी वापरायच्या. अनेक समाजांमधे गर्भपाताला कडक विरोध आहे, गर्भपात म्हणजे जीवाची हत्या करणं असं ते मानतात. अनेक देशांमधे गर्भपात हा बेकायदेशीर मानला जात असला तरी, जगभरातील महिला चळवळीनं कायदेशीर, सुरक्षित, परवडेल असा आणि सहज उपलब्ध गर्भपात हा अधिकार म्हणून मिळवला आहे. भारतात मुद्दाम केलेला गर्भपात हा 1972 च्या वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती कायद्यानं कायदेशीर करण्यात आला आहे. गर्भपातादरम्यान गर्भ आणि नाळ गर्भाशयातून काढून घेतात. गर्भधारणेच्या अवस्थेनुसार, गर्भपाताच्या विविध पध्दती वापरल्या जातात.</p> <p style="text-align: justify; "><strong>शोषून घेणेः</strong> सहा ते आठ आठवड्यांच्या गर्भधारणेसाठी हे योग्य आहे. यामधे एका सक्शन पंपला नळी जोडून सर्वसाधारण किंवा स्थानिक भूल देऊन गर्भाच्या उती काही मिनिटांत ओढून घेतल्या जातात. त्यासाठी रुग्णालयात राहावं लागत नाही.</p> <p style="text-align: justify; "><strong>फुगवणे आणि खरवडणेः</strong> 8 ते 16 आठवड्यांच्या गर्भधारणेसाठी गर्भाशय फुगवले जाते आणि मग ते एका उपरकणाने खरवडून स्वच्छ केले जाते. यावेळी सर्वसाधारण भूल दिली जाते.</p> <p style="text-align: justify; "><strong>मुद्दाम कळा देणेः</strong> 16-20 आठवड्यांच्या गर्भधारणेसाठी, साधारणतः सलाईन, युरीया किंवा प्रोस्टॅग्लँडीनचे द्रावण इंजेक्शनने अम्नीयॉटीक पिशवीत सोडून वेळेपूर्वी कळा आणल्या जाऊन गर्भ बाहेर टाकला जातो. यावेळी स्थानिक भूल दिली जाते आणि एक किंवा दोन दिवस रुग्णालयात राहावं लागतं.</p> <p style="text-align: justify; "><strong>गर्भपाताची गोळीः </strong> मिफेप्रिस्टोन आणि मायसोप्रिस्टल ही ओषधे एकत्रितपणे वापरुन वैद्यकीय गर्भपात करवता येतो आणि त्याचा वापर भारतात अलीकडेच कायदेशीर करण्यात आला आहे. मिफेप्रिस्टोन (यालाच आरयू 486 म्हणतात) ही गर्भपात-विरोधी गोळी आहे मात्र स्वतःहून ती विश्वासार्ह नसल्याचं आढळून आलं आहे आणि त्यामुळं त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी प्रोस्टग्लँडीन (मायसोप्रोस्टॉल) दिली जाते. आरयू-486 ही गोळी गर्भधारणेच्या पहिल्या सहा ते आठ आठवड्यामधेच प्रभावी ठरते. गर्भपाताची गोळी ही वैद्यकीय निगराणीखालीच घ्यावी, कारण त्यामुळे अनियंत्रित रक्तस्त्राव होऊ शकतो. त्याच्या काही ज्ञात दुष्प्रभावांमधे, अनियंत्रित उलट्या आणि मळमळ, आणि अतिशय रक्तस्त्राव होऊन ती महिला कोसळू शकते. गर्भपात होण्यासाठी 12 दिवस लागू शकतात आणि तोवर त्या स्त्रीला रक्तस्त्राव होऊ शकतो. तसंच, आरयू-486 कमी कालावधीच्या गर्भधारणेसाठीच उपयुक्त असल्यानं, गर्भपात न झाल्यास तिचा गर्भावर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करण्यात आलेला नाही.</p> <h3 style="text-align: justify; ">हार्मोनल पध्दती</h3> <p style="text-align: justify; ">इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या शरीरातील दोन हार्मोन्सवर प्रभाव टाकून अंडं तयार होणं किंवा शुक्राणूंची निर्मिती थांबवली जाते. त्यांच्यामुळे गर्भाशयातील श्लेष्मा घट्ट केला जातो (त्यामुळे शुक्राणू गर्भाशयात शिरु शकत नाही), आणि काही प्रकरणी, गर्भाशय आणि अंडनलिकांमधे बदल करुन फलनाला प्रतिबंध केला जातो. हार्मोनल पध्दतींमुळं शरीरातील हार्मोन्सचा नाजुक समतोल बिघडतो. त्यांचे गंभीर दुष्प्रभाव होऊ शकतात आणि पुनरुत्पादक यंत्रणेसोबतच शरीराच्या अन्य भागांवरही त्यांचा परिणाम होतो. म्हणजेच ते शरीरात बदल घडवून आणतात. तथापि, सरकारी गर्भनिरोधक पुरवठादार त्यांचा आदर्श गर्भनिरोधक पध्दत म्हणून प्रचार करतात कारण ते अत्यंत प्रभावी आहेत, सहजपणे देता येतात.</p> <h5 style="text-align: justify; "><strong>तोंडावाटे गर्भनिरोधकः </strong></h5> यामधे पुढील गर्भनिरोधक समाविष्ट आहेतः <p style="text-align: justify; "><strong>संयुक्त मौखिक गर्भनिरोधकः</strong> संयुक्त मौखिक गर्भनिरोधक गोळीत दोन हार्मोन्स, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. मासिकपाळीच्या सुरुवातीला ते इस्ट्रोजेनची पातळी वाढवून अंडाशयात अंडं तयार होण्याला प्रामुख्यानं अटकाव करतात. सध्या कमी डोसमधे उपलब्ध असलेल्या (माला-डी सारख्या) संयुक्त गोळ्या या अधिक डोस असलेल्या (ओव्हरॉलसारख्या) संयुक्त गोळ्यांपेक्षा सुरक्षित आहेत. तथापि, संयुक्त गोळ्या या सर्वच महिलांसाठी योग्य असतात नाही.</p> <p style="text-align: justify; "><strong>प्रोजेस्टेरॉन –</strong> केवळ गोळीः संयुक्त गर्भनिरोधक गोळ्या अंडनिर्मिती थांबवतात, तर<br /> केवळ प्रोजेस्टेरॉन गोळीने गर्भाशयातील श्लेष्मा वाढवून, शुक्राणूंची तसंच अंड्याची हालचाल मंदावून तसंच गर्भाशयाचं अस्तर नीट विकसित न होऊ देण्याव्दारे गर्भधारणा टाळली जाते. या गोळीचे अनेक फायदे आहेत जसे, उच्च प्रभावक्षमता, वापरण्यास सोयीस्कर, समागमात कोणताही अडथळा नाही आणि खात्रीशीररित्या थांबवता येते. तथापि त्याचे अनेक दुष्प्रभाव आहेत त्यांचीही नोंद घ्यावी.</p> <p style="text-align: justify; "><strong>इंजेक्शनव्दारे गर्भनिरोधकः </strong>डेपो प्रोव्हेरा (डेपो मेड्रोझायप्रोजेस्टेरॉन असिटेट) आणि नेट एन (नॉरएथिस्टेरॉन एनान्थेट) हे केवळ प्रोजेस्टेरॉन इंजेक्शनव्दारे द्यावयाचे गर्भनिरोधक आहेत. डेपो प्रोव्हेराचा प्रभाव तीन महिने राहतो आणि नेट एनचा दोन महिने राहतो.</p> <p style="text-align: justify; ">इंजेक्शनव्दारे गर्भनिरोधक ही संततीनियमनाची सोयीस्कर पध्दत वाटते. तथापि, त्यांच्या वापराशी निगडीत अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या आहेत. ते मोठ्या डोसच्या स्वरुपात दिले जात असल्यानं आणि त्यांचा प्रभाव दीर्घकालीन असल्यानं त्यांच्या दुष्प्रभावाची गंभीरता गोळीच्या तुलनेत खूप अधिक आहे. त्याचा प्रभाव 2-3 महिन्यांनी कमी होईतोवर त्या स्त्रीला गर्भधारणेसाठी थांबावं लागेल. सध्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात इंजेक्शन्सचा परवाना देण्यात आलेला नाही. केवळ खाजगी व्यवसायिकांव्दारे वापरण्यासाठी आणि स्वयंसेवी संस्थांव्दारे सामाजिक विपणानासाठी त्यांची 1994 मधे नोंदणी करण्यात आली आहे.</p> <h5 style="text-align: justify; ">केवळ-प्रोजेस्टेरॉन इंजेक्शनच्या वापरांशी निगडीत आरोग्याचे धोके याप्रमाणे</h5> <p style="text-align: justify; "> </p> <ul style="text-align: justify; "> <li>मासिक पाळीचा त्रास – दीर्घकाळ ठीपके आणि अतिशय रक्तस्त्राव ते अजिबात रक्तस्त्राव न होणे</li> <li>रक्तवाहिन्या जाड होणं आणि हृदयरोग</li> <li>अनपेक्षित ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या तयार होणं, त्यामुळं हृदय, फुफ्फुसं आणि मेंदू इत्यादींना नुकसान होणं.</li> <li>हाडांची घनता कमी होणं, हाड मोडण्याचे प्रसंग वाढणं.</li> <li>वजनात बदल</li> <li>अन्य चयापाचयिक बदल, त्यामुळे साखरेची पातळी बदलणं, मानसिक ताण, थकवा, समागमाची इच्छा कमी होणं इत्यादी.</li> <li>पुन्हा गर्भधारणा होण्याचा अंदाज घेता येत नाही (मुलांमधे अंतर ठेवण्याला गंभीर मर्यादा येते)</li> <li>कर्करोगाचा धोका – अनुत्तरीत प्रश्न</li> <li>गर्भावर विपरीत परिणाम (अपघाताने गर्भधारणा राहिल्यास)</li> </ul> <h3 style="text-align: justify; ">आपात्कालीन गर्भनिरोधक गोळी किंवा <span>असुरक्षित समागमा</span>नंतरच्या सकाळी घ्यावयाची गोळी</h3> <p style="text-align: justify; ">असुरक्षित समागमानंतर, आपात्कालीन गर्भनिरोधक गोळीने गर्भधारणा टाळता येते. तिलाच नंतरच्या सकाळी घ्यावयाची गोळी म्हणतात. एखाद्या महिलेला तिच्या इच्छेविना समागमास भाग पाडले असेल (बलात्कार), कंडोम फाटला असेल किंवा अचानक समागम झाला असेल तेव्हा ही गोळी उपयोगी ठरते. असुरक्षित समागमानंतर 72 तासांपर्यंत (3 दिवस) ही गोळी वापरता येते. चार प्रमाणित किंवा कमी डोसच्या मौखिक गर्भनिरोधक जसे, माला-डी किंवा माला-एन आपात्कालीन गर्भनिरोधक म्हणून घेता येतात. लेव्होनोर्जेस्ट्रेल हे औषध असलेली नंतरच्या सकाळी घ्यावयाची गोळी कुटुंब नियोजन कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. या दोन गोळ्या असुरक्षित समागमानंतर चार दिवसांच्या आत घ्यायच्या आहेत.</p> <p style="text-align: justify; ">त्याच्या दुष्प्रभावांमधे, मळमळ, उलट्या आणि पुढच्या मासिक पाळीचं चक्र बिघडणे यांचा समावेश होतो. ही गोळी कसं कार्य करते ते स्पष्ट नाही. त्यामुळे अंडंनिर्मिती थांबते, आणि फलन झाले असेल तर त्यात हस्तक्षेप करण्यातही ती कार्य करते. तथापि ती 100 टक्के प्रभावी नाही. मासिक पाळीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात एकदा असुरक्षित समागमामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता 8 टक्के आहे आणि आपात्कालीन गोळी घेतल्यानंतर ती 2 टक्के होते.</p> <p style="text-align: justify; "><span>आपात्कालीन गर्भ</span>निरोधक गोळी उपयोगी न ठरल्यास, गर्भात विकृती होण्याची शक्यता असते. त्यामुळे, गर्भपाताचे पुरेसे कायदेशीर आणि सुरक्षित संरक्षण याची खात्री आहे हे पाहूनच आपात्कालीन गर्भनिरोधकाचा वापर करावा.</p> <p style="text-align: justify; ">कायमस्वरुपी पध्दतीः पुरुष आणि महिलांमधे शुक्राणू / अंडं वाहून नेणा-या नसा बंद करुन किंवा कापून टाकून कायमस्वरुपी पध्दत अवलंबली जाते. नव्या वैद्यकीय तंत्रानुसार, नसा पुन्हा जोडता येतात, परंतु ते नेहमीच य़शस्वी होत नाही किंवा शक्य होत नाही, त्यामुळे सर्वच दृष्टीकोनातून ही पध्दत पुन्हा पूर्व स्थितीला आणता येत नाही. नसबंदीकरण अत्यंत प्रभावी आहे. ज्यांच्या कुटुंबाचा आकार अपेक्षेनुसार झालेला आहे आणि आणखी मुलं नको आहेत अशा लोकांसाठी ही पध्दत योग्य आहे.</p> <h3 style="text-align: justify; ">पुरुष नसबंदी</h3> <p style="text-align: justify; ">पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेव्दारे करण्यात येते. त्यामधे पुरुषाची शुक्राणूवाहक नलीका अडवली जाते त्यामुळे शुक्राणू हे वीर्यासह शीश्नाकडे जाऊ शकत नाहीत. तथापि पुरुषाचे स्खलन चालू राहते आणि त्याच्या समागमाच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. पुरुषीपणा आणि समागमाची क्षमता याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी पुरेसे आणि संवेदनशील समुपदेशन उपयुक्त ठरते.</p> <p style="text-align: justify; ">यात कुठलीही शस्त्र वापरली जात नाहीत तर मुश्काच्या दोन्हा बाजूस बारीक छीद्र केली जातात आणि नसा कापून बांधल्या जातात किंवा त्यांनी चिमटा लावण्यात येतो.</p> <p style="text-align: justify; ">नसबंदी ही लहान आणि साधी शस्त्रक्रिया आहे मात्र त्यानंतर त्या पुरुषाला किमान ४८ तास विश्रांती घ्यावी लागते. त्यानं एक आठवडापर्यंत कोणतीही जड वस्तु उचलू नये. अस्वस्थतेची सर्व लक्षणे गेल्यानंतरच त्याने पुन्हा समागमाला सुरुवात करावी, पण कोणत्याही परिस्थितीत एक आठवडा झाल्यानंतरच. शस्त्रक्रियेनंतर किंमान दोन ते तीन महिने गर्भनिरोधनाची पर्यायी पध्दत वापरलीच पाहिजे कारण, एखादा शुक्राणू हा शुक्रवाहक नलिकेत तीन महिनेपर्यंत राहू शकतो. या शस्त्रक्रियेनंतर उच्च ताप, अतिरीक्त रक्तस्त्राव, सूज किंवा वेदना झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.</p> <p style="text-align: justify; ">पुरुष नसबंदी करणे केव्हाही चांगले कारण, पुरुषांचे गुप्तांग हे स्त्रियांच्या तुलनेत बाहेर असते आणि शरीराच्या अन्य भागात फारसा हस्तक्षेप होत नाही, गुंतागुंतही कमी होते. नसबंदी केलेल्या पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका वाढतो असं अलीकडे केलेल्या संशोधनात आढळून आलं आहे. या नसबंदीशी निगडीत अन्य कोणतेही दीर्घकालीन धोके नाहीत.</p> <h3 style="text-align: justify; ">स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया</h3> <p style="text-align: justify; ">यामधे स्त्रीच्या ओटीपोटात एक लहान छेद घेऊन तिच्या अंडवाहक नलीकांपर्यंत जाऊन त्या कापल्या जातात, बांधल्या जातात किंवा त्यांना चिमटा लावला जातो. त्यामुळे अंडाशयात तयार होणारी अंडी शुक्राणूसोबत फलित होत नाहीत. ही शस्त्रक्रिया योग्यप्रकारे केल्यास खूप प्रभावी ठरते, तरी गुंतागुत होऊ शकते आणि होते. त्यामधे, संक्रमण, अंतर्गत रक्तस्त्राव आणि गर्भाशयाला आणि / किंवा आतड्यांना छीद्र पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे हृदयाची समस्या, अनियमित रक्तस्त्राव, मासिकपाळीत तीव्र वेदना आणि गर्भाशय वारंवार स्वच्छ करावं लागणं किंवा ते काढून टाकणे या समस्याही होतात. अशावेळी तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. नसबंदी करण्यापूर्वी आणि नंतर योग्य खबरदारी घेतली पाहिजे. शस्त्रक्रियेनंतर अंदाजे 48 तास विश्रांती घेतली पाहिजे. नेहमीची कामं 2-3 दिवसांनी सुरु करावीत परंतु त्या स्त्रीने एक आठवडापर्यंत जड वस्तु उचलता कामा नयेत. समागम सामान्यतः एक आठवड्याने सुरु करावा.</p> <p style="text-align: justify; ">या नसबंदीशी निगडीत धोके ओटीपोटाच्या कोणत्याही मोठ्या धोक्यांप्रमाणेच आहेत – हृदयाची अनियमितता, हृदयविकाराचा झटका, संक्रमण, अंतर्गत रक्तस्त्राव आणि मोठ्या रक्तवाहीनीला छीद्र पडणे. योग्य काळजी न घेता केलेल्या नसबंदीमधे हे धोके अनेकपटीने वाढतात, उदाहरणार्थ, जिथे मोठ्या संख्येनं महिलांची नसबंदी केली जाते. फिरती शिबिरं आणखीच समस्याग्रस्त असतात कारण तिथे देखरेख आणि पाठपुरावा यांची शक्यता नसते. दुर्बिण तंत्रात विशिष्ट समस्या होऊ शकतात, जसे, अंतर्गत भाजल्याची जखम, अन्य अवयव किंवा उतींना छीद्र पडणे, त्वचा भाजणे, गर्भाशयाला छीद्र पडणे आणि कार्बन डाय ऑक्साईड आंतरकीलन (यामुळे तत्काळ मृत्यु येऊ शकतो</p> <strong> स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम </strong></div>