सामान्यपणे अनेक बारीकसारीक दुखण्याकडे दुर्लक्ष करून आपली दैनंदिन कामे कशी व्यवस्थित होतील, याकडे गृहिणींचा कल असतो. जोपर्यंत ताप येऊन थकवा येऊन कामे होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हाच पुष्कळ वेळा लक्ष देऊन औषधे घेतली जातात. नीट निरीक्षण केले तर कितीतरी वेळा पोटात दुखणे ही तक्रार अधूनमधून जाणवते. लहान मुलांनासुद्धा बऱ्याचदा पोट दुखणे हे लक्षण आढळून येते. याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. प्रत्येक वेळी खूप मोठा आजार असतोच असे नाही. मग नेमकी कोणती कारणे सामान्यपणे पोट दुखण्यास कारणीभूत ठरतात, हे जाणून घेणे घरच्या गृहिणीला फार महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्वतःची, मुलांची काळजी ती घेऊ शकेल. पोटदुखीच्या कारणांचा विचार करता खूप कोरडा तिखट आहार घेणे, जेवणाची वेळ अनियमित नसणे, पाणी कमी पिणे, ब्रेड-पाव, शिळे अन्न जास्त खाणे, पोट साफ नसणे, लघवीला जाण्याचा कंटाळा करणे आदींमुळे पोट दुखू शकते. मुलांच्या बाबतीत स्वच्छ हात न धुणे, खूप गोड खाणे या कारणांनी जंत होऊन पोट दुखू शकते. मात्र फार वाट न पाहता तज्ज्ञांना दाखवावे. कारण मुतखड्यामुळेही पोटात दुखू शकते. यासाठी वाळा, चंदन, गोखरू पावडर घालून केलेले औषधी पाणी पिण्यास द्यावे. तरुण वयात आलेल्या मुलींना शतावरी कल्प किंवा पावडर दुधाबरोबर रोज द्यावी, त्यामुळे गर्भाशयाला बळ मिळते. मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो. तांदळाचे धुवण म्हणजे तांदूळ धुऊन जे पाणी मिळते, ते जर घेतले तरी अतिस्राव, पांढरे जाणे, कंबरदुखी, पोटदुखी कमी होते. आहारातही गरम वरणात/ आमटीत पोळी किंवा भाकरी कालवून ओलसर करून खावी. खूप तिखट, तेलकट खाऊ नये. जेवणाची वेळ नियमित ठेवावी. मुलांना पौष्टिक आहार द्यावा. विशेषतः मुली मोठ्या होत असताना खारीक पूड, दूध, डिंक, खीर, शतावरी घातलेले दूध, साजूक तूप यांचा समावेश जरूर आहारात असावा. चौरस पौष्टिक आहार, जेवणाची वेळ नियमित ठेवणे, बाहेरचे खाणे कमी करणे या गोष्टी पाळल्या आणि पाणी भरपूर प्यायले, तर पोटदुखीची तक्रार सहसा आढळत नाही. गृहिणीला जर या गोष्टी, याची कारणे माहीत असतील तर कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने ती नक्की सतर्क राहील, असा मला विश्वास आहे. पोट दुखल्यास हे करून पाहा गरम पाणी पिणे गरम पाण्यात लिंबू पिळून व मीठ घालून घेतले तर लवकर आराम पडतो. बेंबीपाशी (नाभीजवळ) मुरडा आल्यास पाण्यात बडीशेप घालून उकळलेले पाणी गरम प्यावे. ओवा, जिरे, हळीव, मेथ्या यांची बारीक पावडर करावी. प्रत्येकी समभागच घ्यावे. ही पावडर अर्धा चमचा प्रमाणात गरम पाण्यासह घ्यावी. जेवणानंतर ओवा आणि मीठ चावून खावे पचन चांगले होते. स्त्रोत: अग्रोवन